गणपतीची वंशवेल, चंद्रदर्शन
दोषावरील श्लोक, चित्पावनी आरती !
( गणेश चतुर्थी निमित्त वेगळीच माहिती
)
महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा एक
पारंपरिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्वाचा असा महोत्सव आहे. भक्ती आणि मनोरंजनाबरोबरच गायन, वादन,
नृत्य, अभिनय, वक्तृत्व,
मूर्तिकला, चित्रकला, सजावट
अशा अनेक कलांना भरपूर वाव देणारा हा सण आहे. नेतृत्व, वक्तृत्व,
नियोजन, समाजकारण यांची जोपासना करण्याची
सुसंधी यावेळी लाभते. या वर्षी कोरोना महामारीमुळे या सर्व गोष्टी काही काळ तरी
मंदावल्या आहेत. पण भक्तीमध्ये खंड पडणार नाही. हिंदूंनी आपले गुढी पाडवा, आषाढी एकादशी,वटपौर्णिमा,नागपंचमी,
कृष्णजन्माष्टमी, असे
सगळे सण,सर्व सरकारी नियमांचे पालन करून साजरे केले. शेकडो
वर्षांची परंपरा असलेली पंढरपूर वारी, दहीहंडी, अनेक जत्रा, उत्सव हे सार्वजनिकपणे साजरे न करता
फक्त धार्मिक विधी, पूजा केल्या. मंदिरांनी, उत्सव मंडळांनी भरभरून देणग्या दिल्या. अन्नदान, रक्तदान,
प्लाझ्मा दान, PPE किट वाटप, मास्क वाटप,सॅनिटायझर वाटप, शिधा
वाटप अशा गोष्टी मुक्तहस्ताने केल्या.हजारो खाटांची विलगीकरण केंद्रे उभारली.याच
देशातील कांही मंडळी आडमुठे पणाने वागत असतांना बहुसंख्य हिंदू धर्मीय मात्र यात
कुठला प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, सरकारला अत्यंत संयमाने
सहकार्य करीत आहेत. पण सतत हिंदूंना झोडणाऱ्या एकाही माध्यमाने किंवा एकाही
धर्मनिरपेक्ष, पुरोगामी नेत्याने त्यासाठी हिंदूंची स्तुती
केलेली नाही. कौतुकाचा एक शब्द नाही.असो.
आता गणेशोत्सवही असाच नियम व अटी पाळून होणार
आहे. डामडौल, धुमधडाका नाही पण धार्मिक विधी पूर्ण
भक्तिभावाने केले जातील. यावर्षीच्या अशा या अतिशय वेगळ्या गणेशोत्सवासाठी ही अशीच
काही वेगळी माहिती.
गणपतीची वंशवेल --- महाराष्ट्रामध्ये
साधारणतः गणपती, त्याचे मातापिता आणि भाऊ यांचीच चर्चा होते.
पण हजारो वर्षे पुरातन आणि हजारो मैल पसरलेल्या या हिंदू धर्मामध्ये विविध ठिकाणी
विविध कथा, आख्यायिका, दंतकथा
पसरलेल्या आहेत. त्यानुसार गणपती बाप्पाची वंशवेल ( Family Tree ) पाहण्यासारखी आहे. खरे तर यामध्ये प्रतीकात्मकता आहे पण त्याची माहिती
करून घ्यायला हरकत नाही. गणेशाचे शिव पार्वती हे मातापिता आणि कार्तिकस्वामी हा
भाऊ. गणेशाला ऋद्धी आणि सिद्धी अशा दोन पत्नी असून त्याला शुभ ( क्षेम ) आणि लाभ
असे दोन पुत्र आहेत. संतोषीमाता ही गणेशाची कन्या ! खरं सांगायचं तर ही संतोषीमाता
आपल्या महाराष्ट्राला जेव्हा ' जय संतोषी माता ' हा चित्रपट आला आणि त्यातील " मै तो आरती उतरू रे संतोषीमाता की
" हे गीत खूप गाजले, त्यावेळी माहिती झाली. त्याला
तुष्टी आणि पुष्टी अशा दोन सुना आणि आमोद आणि प्रमोद असे दोन नातूही आहेत. गणेशाचे
हे सर्व कुटुंबीय मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर भारतामध्ये अधिक प्रसिद्धी पावलेले
आहेत.
गणेशचतुर्थीला निषिद्ध असलेले चंद्रदर्शन ----
प्रत्येक संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्र दर्शन झाल्याशिवाय सोडायचा नसतो. पण
गणेशचतुर्थीला मात्र चंद्रदर्शन पूर्णपणे निषिद्ध मानलेले आहे. पंचांगामध्ये आणि
कालनिर्णयमध्ये दर संकष्टीला चंद्रोदयाच्या वेळ
दिलेली असते. पण गणेशचतुर्थीला मात्र चंद्रास्ताची वेळ दिलेली असते. मूषकवाहनावरून
चाललेल्या तुंदिलतनु गणेशाला पाहून चेष्टेने हसलेल्या चंद्राला गणेशाने शाप दिला.
नंतर चंद्राला पश्चात्ताप झाल्यावर उ:शाप दिला अशी कथा आहे. या दिवशी मात्र
चंद्रदर्शन झाल्यास मिथ्थ्या दोष लागतो म्हणजे चोरीचा आळ येतो. याच कारणामुळे
प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक
मणी चोरल्याचा आरोप आला होता. सगळ्यात गंमत अशी आहे की एरवी आपले कधी चंद्राकडे
लक्षही जात नाही पण या दिवशी मात्र चंद्राचे चुकून का होईना पण अचूक दर्शन होते.
चंद्र दिसला खूप की चुटपुट लागते, अपराधी भावना होते.
त्यामुळे मग नंतरच्या काळात परीक्षेत कमी गुण मिळणे, अपयश,
चोरी, एखादा छोटा अपघात असे काहीही घडले तरी
ते या दोषामुळेच झाले असे माणसाला वाटायला लागते. अशावेळी एक संस्कृत श्लोक आहे तो
म्हटल्याने हा दोष लागत नाही असे मानले जाते. खरे तर हा एक उत्तम मानसोपचारच
म्हणायचा ! तो श्लोक असा -- सिंहः प्रसेनमवधीत सिंहो जाम्बवता हतः। सुकुमारक मा
रोदीस्तव ह्येष: स्यमन्तकः॥ हा मंत्र म्हणतांना पाणी प्यावे असेही सांगितले जाते.
या
संबंधात मी कांही जुन्या मंडळींकडून एक आख्यायिका ठामपणे ऐकली आहे.पण याला कुठेही
आधार सापडत नाही. यावेळी काही विशिष्ट जातीची डुकरे, चंद्रास्त
होईपर्यंत, मातीत आपले तोंड खुपसून बसतात. एरवी तर शहामृगही
वाळूत घातलेली आपली अंडी उलटसुलट करण्यासाठी वाळूत तोंड खुपसून बसतात. पण डुकरांचे
काय असेल ? मुळातच हे खरे आहे का ? जर
असे कुणी पहिले असेल तर आपले निरीक्षण अवश्य नोंदवावे, यासाठी
मी हे लिहीत आहे.
चित्पावनी
भाषेतील गणपतीची आरती ---- पूर्वी प्रत्येक चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात
अत्यंत वेगळी अशी चित्पावनी भाषाच फक्त बोलली जात असे. कोकणी आणि मालवणीच्या जवळची
वाटावी अशी ही स्वतंत्र भाषा आहे ! कोकणातील कांही भाग , गोवा
आणि कर्नाटकमध्ये तर आजही हजारो चित्पावन ब्राह्मणांच्या घरात हीच भाषा बोलली
जाते. गोव्यातील अस्नोडा येथिल श्री. श्रीधर केशव बर्वे यांनी ही भाषा कशी बोलावी
यावर " सुलभ चित्पावनी " हे पुस्तक (आता ३ री आवृत्ती ) लिहिले आहे.
कर्नाटकातील सौ. सुचेता जोशी यांनी चित्पावनी म्हणी, गाणी यावर पुस्तके लिहिली असून चित्पावनी भाषाकोशावरही काही मंडळी काम
करीत आहेत. त्यांनी हजारो चित्पावनी शब्दांचे संकलन केले
आहे. गोव्यातील कडतरी येथील श्री. अशोक नेने यांनी '
खडतर जिणां ' हे चित्पावनी भाषेतील पहिले ललित
लेखनाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. श्री. श्रीधर केशव बर्वे यांनी लिहिलेल्या
" निबरांतली सावळी '' या चित्पावनी भाषेतील पहिल्याच
पूर्ण लांबीच्या नाटकाचा प्रयोग नुकताच डिचोलीमध्ये दणक्यात सादर झाला. याच
ठिकाणच्या श्री. विश्वनाथ दांडेकर यांनी गणपतीची आरती या चित्पावनी भाषेत लिहिली
आहे. यातील शब्दरचनाआणि भक्तिभाव आपल्याला कळण्यासारखा
आहे. यावर्षीच्या अतिशय वेगळ्या गणेशोत्सवासाठी ही अतिशय वेगळी आरती !
या धर्मावर
आणि देशावर आपले नि:संशय प्रेम आहे. म्हणूनच यावर्षी गणपती बाप्पाला गाऱ्हाणे
घालूया. "हे गणपतीबाप्पा महाराजा, या देशातील
प्रत्येकाला या देशाबद्द्ल प्रेम वाटू दे. सर्वांना सुबुद्धी लाभू दे.समृद्धी लाभू
दे .सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभू दे . दीर्घायुष्य लाभू दे. या देशावर, धर्मावर कोणाची वाकडी नजर असेल, वाईट विचार असेल तर देवा, त्याचे तू परस्पर काय ते निर्दालन कर, रे महाराजा. होय
महाराजा "
***** मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com