मनाचे श्लोक
गणाधीश जो ईश सर्वां
गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो
निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार
वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा
॥१॥
मना सज्जना भक्तिपंथेंचि
जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो
स्वभावें ।
जनीं निंद्य तें सर्व
सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्व
भावें करावें ॥२॥
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ।
पुढें वैखरी राम आधीं
वदावा ।
सदाचार हा थोर सोडूं नये
तो ।
जनीं तोचि तो मानवीं
धन्य होतो ॥३॥
मना वासना दुष्ट कामा
नये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी
नको रे ।
मना सर्वथा नीति सोडूं
नको हो ।
मना अंतरीं सारवीचार
राहो ॥४॥
मना पापसंकल्प सोडूनि
द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं
धरावा ।
मना कल्पना ते नको
वीषयांची ।
विकारें घडे हो जनीं
सर्व ची ची ॥५॥
नको रे मना क्रोध हा
खेदकारी ।
नको रे मना काम
नानाविकारी ।
नको रे मना सर्वथा
अंगिकारूं ।
नको रे मना मत्सरू
दंभभारू ॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ठ
जीवीं धरावें ।
मना बोलणें नीच सोशीत
जावें ।
स्वयें सर्वदा नम्र वाचे
वदावें ।
मना सर्व लोकांसि रे
नीववावें ॥७॥
देहे त्यागितां कीर्ति
मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया
धरावी ।
मना चंदनाचेपरी त्वां
झिजावें ।
परी अंतरीं सज्जना
नीववावें ॥८॥
नको रे मना द्रव्य तें
पूढिलांचें ।
अति स्वार्थबुद्धीन रे
पाप सांचे ।
घडे भोगणें पाप तें कर्म
खोटें ।
न होतां मनासारिखें दुःख
मोठें ॥९॥
सदा सर्वदा प्रीति रामीं
धरावी ।
दुःखाची स्वयें सांडि
जीवीं करावी ।
देहेदुःख हें सूख मानीत
जावें ।
विवेकें सदा स्वस्वरूपीं
भरावेंं ॥१०॥
जनीं सर्वसूखीं असा कोण
आहे ।
विचारें मना तूंचि
शोधूनि पाहें ।
मना त्वांचि रे
पूर्वसंचीत केलें ।
तयासारिखें भोगणें
प्राप्त जालें ॥११॥
मना मानसीं दुःख आणूं
नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता
नको रे ।
विवेकें देहेबुध्दि
सोडूनि ्द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत
जावी ॥१२॥
मना सांग पां रावणा काय
जालें ।
अकस्मात तें राज्य सर्वे
बुडालें ।
म्हणोनी कुडी वासना
सांडिं वेगीं ।
बळें लागला काळ हा
पाठिलागीं ॥१३॥
जिवा कर्मयोगें जनीं
जन्म जाला ।
परी सेवटीं काळमूखीं
निमाला ।
महा थोर ते
मृत्युपंथेंचि गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि
मेले ॥१४॥
मना पाहतां सत्य हे
मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव
मी मी ।
चिरंजीव हे सर्वही
मानिताती ।
अकस्मात सांडूनियां सर्व
जाती ॥१५॥
मरे येक त्याचा दुजा शोक
वाहे ।
अकस्मात तोही पुढें जात
आहे ।
पुरेना जनीं लोभ रे
क्षोभ त्यातें
म्हणोनी जनीं मागुता
जन्म घेतें ॥१६॥
मनीं मानव व्यर्थ चिंता
वहातें ।
अकस्मात होणार होऊनि
जातें ।
घडे भोगणें सर्वही
कर्मयोगें ।
मतीमंद तें खेद मानी
वियोगें ॥१७॥
मना राघवेंवीण आशा नको
रे ।
मना मानवाची नको कीर्ति
तूं रे ।
जया वर्णिती वेद
शास्त्रें पुराणें ।
तया वर्णितां सर्वही
श्लाघ्यवाणें ॥१८॥
मना सर्वथा सत्य सोडूं
नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडूं
नको रे ।
मना सत्य तें सत्य वाचे
वदावें ।
मना मिथ्य तें मिथ्य
सोडूनि द्यावें ॥१९॥
बहू हिंपुटी होइजे
मायपोटीं ।
नको रे मना यातना तेचि
मोठी ।
निरोधें पचे कोंडिलें
गर्भवासीं ।
अधोमूख रे दुःख त्या
बाळकासी ॥२०॥
मना वासना चूकवीं
येरझारा ।
मना कामना सांडिं रे
द्रव्यदारा ।
मना यातना थोर हे
गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं
राघवासी ॥२१॥
मना सज्जना हीत माझें
करावें ।
रघूनायका दृढ चित्तीं
धरावें ।
महाराज तो स्वामि
वायूसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा
॥२२॥
न बोलें मना राघवेंवीण
कांहीं ।
जनीं वाउगें बोलतां सूख
नाहीं ।
घडीनें घडी काळ आयुष्य
नेतो ।
देहांतीं तुला कोण सोडूं
पहातो ॥२३॥
रघुनायकावीण वायां
सिणावें ।
जनासारिखें व्यर्थ कां
वोसणावें ।
सदा सर्वदा नाम वाचें
वसों दे ।
अहंता मनीं पापिणी ते नसों
दे ॥२४॥
मना वीट मानूं नको
बोलण्याचा ।
पुढें मागुता राम जोडेल
कैंचा ।
सुखाची घडी लोटतां सूख
आहे ।
पुढें सर्व जाईल कांहीं
न राहे ॥२५॥
देहेरक्षणाकारणें यत्न
केला ।
परी शेवटीं काळ घेऊनि
गेला ।
करीं रे मना भक्ति या
राघवाची ।
पुढें अंतरीं सोडिं
चिंता भवाची ॥२६॥
भवाच्या भयें काय भीतोस
लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि
सांडीं ।
रघुनायकासारिखा स्वामि
शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या
दंडधारी ॥२७॥
दिनानाथ हा राम
कोदंडधारी ।
पुढें देखतां काळ पोटीं
थरारी ।
जना वाक्य नेमस्त हें
सत्य मानीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥२८॥
पदीं राघवाचे सदा ब्रीद
गाजे ।
बळें भक्तरीपूशिरीं
कांबि वाजे ।
पुरी वाहिली सर्व जेणें
विमानीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥२९॥
समर्थाचिया सेवका वक्र
पाहे ।
असा सर्व भूमंडळीं कोण
आहे ।
जयाची लिळा वर्णिती लोक
तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३०॥
महासंकटीं सोडिलें देव
जेणें ।
प्रतापें बळें आगळा
सर्वगूणें ।
जयातें स्मरे शैलजा
शूळपाणी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३१॥
अहल्या शिळा राघवें
मुक्त केली ।
पदीं लागतां दिव्य होऊनि
गेली ।
जया वर्णितां सीणली
वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३२॥
वसे मेरु मांदार हे
सृष्टिलीळा ।
शशी सूर्य तारांगणें
मेघमाळा ।
चिरंजीव केले जनीं दास
दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३३॥
उपेक्षा कदा रामरूपीं
असेना ।
जिवां मानवां निश्चयो तो
वसेना ।
शिरीं भार वाहेन बोले
पुराणीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३४॥
असे हो जया अंतरीं भाव
जैसा ।
वसे हो तया अंतरीं देव
तैसा ।
अनन्यास रक्षीतसे
चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३५॥
सदा सर्वदा देव सन्नीध
आहे ।
कृपाळूपणें अल्प धारिष्ट
पाहे ।
सुखानंद आनंद कैवल्य
दानी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३६॥
सदा चक्रवाकासी मार्तंड
जैसा ।
उडी घालितो संकटीं
स्वामि तैसा ।
हरीभक्तिचा घाव गाजेे
निशाणीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३७॥
मना प्रार्थना तूजला येक
आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि
पाहें ।
अवज्ञा कदा हो येदर्थीं
न कीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति
कीजे ॥३८॥
जया वर्णिती
वेदशास्त्रेंपुराणें ।
जयाचेनि योगें समाधान
बाणे ।
तयालागि हें सर्व
चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति
कीजे ॥३९॥
मना पाविजे सर्वही सूख
जेथें ।
अती आदरें ठेविजे लक्ष्य
तेथें ।
विवेकें कुडी कल्पना
पालटीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति
कीजे ॥४०॥
बहू हिंडतां सौख्य होणार
नाहीं ।
सिणावें परी नातुडे हीत
कांहीं ।
विचारें बरें अंतरा
बोधवीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति
कीजे ॥४१॥
बहूतांपरी हेंचि आतां
धरावें ।
रघूनायका आपुलेसें
करावें ।
दिनानाथ हें तोडरीं
ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति
कीजे ॥४२॥
मना सज्जना येक जीवीं
धरावें ।
जनीं आपुलें हीत तुवां
करावें ।
रघुनायकावीण बोलों नको
हो ।
सदा मानसीं तो निजध्यास
राहो ॥४३॥
मना रे जनीं मौन्यमुद्रा
धरावी ।
कथा आदरें राघवाची करावी
।
नसे राम तें धाम सोडूनी
द्यावें ।
सुखालागिं आरण्य सेवीत
जावें ॥४४॥
जयाचेनि संगें समाधान
भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि
लागे ।
तये संगतीची जनीं कोण
गोडी ।
जिये संगतीनें मति राम
जोडी ॥४५॥
मना जे घडी राघवेंवीण
गेली ।
जनीं आपुली ते तुवां
हानि केली ।
रघुनायकावीण तो सीण आहे
।
जनीं दक्ष तो लक्ष्य
लाऊनि पाहे ॥४६॥
मनीं लोचनीं श्रीहरी
तोचि पाहें ।
जनीं जाणता भक्त होऊनि
राहें ।
गुणीं प्रीति राखे
क्रमूं साधनचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥४७॥
सदा देवकाजीं झिजे देह
ज्याचा ।
सदा रामनामें वदे नित्य
वाचा ।
स्वधर्मेंचि चाले सदा
उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥४८॥
सदा बोलण्यासारिखें
चालताहे ।
अनेकीं सदा येक देवासि
पाहे ।
सगूणीं भजे लेश नाहीं
भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥४९॥
नसे अंतरीं कामकारी
विकारी ।
उदासीन जो तापसी
ब्रह्मचारी ।
निवाला मनीं लेश नाहीं
तमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५०॥
मदें मत्सरें सांडिली
स्वार्थबुद्धि ।
प्रपंचीक नाहीं जयातें
उपाधी ।
सदा बोलणें नम्र वाचा
सुवाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५१॥
क्रमी वेळ जो
तत्वचिंतानुवादें ।
न लिंपे कदा दंभवादें
विवादें ।
करी सूखसंवाद जो ऊगमाचा
।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५२॥
सदा आर्जवी प्रीय जो
सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्यवादी
विवेकी ।
न बोले कदा मिथ्य वाचा
त्रिवाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५३॥
सदा सेवि आरण्य
तारुण्यकाळीं ।
मिळेना कदा कल्पनेचेनि
मेळीं ।
चळेना मनीं निश्चयो दृढ
ज्याचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५४॥
नसे मानसीं नष्ट आशा
दुराशा ।
वसे अंतरीं प्रेमपाशा
पिपाशा ।
ऋणी देव हा भक्तिभावें
जयाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५५॥
दिनाचा दयाळू मनाचा
मवाळु ।
स्नेहाळू कृपाळू जनीं
दासपाळु ।
तया अंतरीं क्रोध संताप
कैंचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५६॥
जगीं होइजे धन्य या
रामनामें ।
क्रिया भक्ति ऊपासना
नित्यनेमें ।
उदासीनता तत्वता सार आहे
।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति
राहे ॥५७॥
नको वासना वीषईं
वृत्तिरूपें ।
यदर्थीं जडे कामना
पूर्वपापें ।
सदा राम निःकाम चिंतीत
जावा ।
मना कल्पनालेश तोही
नसावा ॥५८॥
मना कल्पना कल्पितां
कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा
रामभेटी ।
मनीं कामना राम नाहीं
जयाला ।
अती आदरें प्रीति नाहीं
तयाला ॥५९॥
मना राम कल्पतरू कामधेनु
।
निधी सार चिंतामणी काय
वानूं ।
जयाचेनि योगें घडे सर्व
सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण
आतां ॥६०॥
उभा कल्पवृक्षातळीं दुःख
वाहे ।
तया अंतरीं सर्वदा तेंचि
आहे ।
जनीं सज्जनीं वाद हा
वाढवावा ।
पुढें मागुतां शोक जीवीं
धरावा ॥६१॥
निजध्यास तो सर्व तूटोनी
गेला ।
बळें अंतरीं शोकसंताप
ठेला ।
सुखानंद आनंद भेदें
बुडाला ।
मनीं निश्चयो सर्व खेदें
उडाला ॥६२॥
घरीं कामधेनू पुढें ताक
मागे ।
हरीबोध सांडूनि वेवाद
लागे ।
करीं सार चिंतामणी
काचखंडें ।
तया मागतां देत आहे
उदंडें ॥६३॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी
असेना ।
अती काम त्या राम
चित्तीं वसेना ।
अती लोभ त्या क्षोभ होईल
जाणा ।
अती वीषई सर्वदा
दैन्यवाणा ॥६४॥
नको दैन्यवाणें जिणें
भक्तिऊणें ।
अती मूर्ख त्या सर्वदा
दुःख दूणें ।
धरीं रे मना आदरें
प्रीति रामीं ।
नको वासना हेमधामीं
विरामीं ॥६५॥
नव्हे सार संसार हा घोर
आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि
पाहें ।
जनीं वीष खातां पुढें
सूख कैचें ।
करीं रे मना ध्यान या
राघवाचें ॥६६॥
घनश्याम हा राम
लावण्यरूपी ।
महा धीर गंभीर
पूर्णप्रतापी ।
करी संकटीं सेवकाचा
कुडावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥६७॥
बळें आगळा राम कोदंडधारी
।
महाकाळ विक्राळ तोही
थरारी ।
पुढें मानवा किंकरा कोण
केवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥६८॥
सुखानंदकारी निवारी
भयातें ।
जनीं भक्तिभावें भजावें
तयातें ।
विवेकें त्यजावा अनाचार
हेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥६९॥
सदा रामनामें वदा
पूर्णकामें ।
कदा बाधिजेना पदा
नित्यनेमें ।
मदालस्य हा सर्व सोडूनि
द्यावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७०॥
जयाचेनि नामें महादोष
जाती ।
जयाचेनि नामें गती
पाविजेती ।
जयाचेनि नामें घडे
पुण्यठेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७१॥
न वेंचे कदा ग्रंथिंचे
अर्थ कांहीं ।
मुखें नाम उच्चारितां
कष्ट नाहीं ।
महाघोर संसार शत्रू
जिणावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७२॥
देहेदंडणेचें महादुःख
आहे ।
महां दुःख तें नाम घेतां
न राहे ।
सदाशीव चिंतीतसे देवदेवा
।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७३॥
बहुतांपरी संकटें
साधनाचीं ।
व्रतें दान उद्यापनें
तीं धनाचीं ।
दिनाचा दयाळू मनीं
आठवावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७४॥
समस्तामध्यें सार साचार
आहे ।
कळेना तरी सर्व शोधून
पाहे ।
जिवा संशयो वाउगा तो
त्यजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७५॥
नव्हे कर्म ना धर्म ना
योग कांहीं ।
नव्हे भोग ना त्याग ना
सांग पाहीं ।
म्हणे दास विश्वास नामीं
धरावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत
जावा ॥७६॥
करी काम निःकाम या
राघवाचें ।
करी रूप स्वरूप सर्वां
जिवांचें ।
करी छंद निर्द्वंद्व हे
गूण गातां ।
हरीकीर्तनीं
वृत्तििवश्वास होतां ॥७७॥
अहो ज्या नरा रामविश्वास
नाहीं ।
तया पामरा बाधिजे सर्व
कांहीं ।
महाराज तो स्वामि
कैवल्यदाता ।
वृथा वाहणें
देहसंसारचिंता ॥७८॥
मना पावना भावना राघवाची
।
धरी अंतरीं सोडिं चिंता
भवाची ।
भवाची जिवा मानवा भूलि
ठेली ।
नसे वस्तुची धारणा
व्यर्थ गेली ॥७९॥
धरा श्रीवरा त्या हरा
अंतरातें ।
तरा दुस्तरा त्या परा
सागरातें ।
सरा वीसरा त्या भरा
दुर्भरातें ।
करा नीकरा त्या खरा
मत्सरातें ॥८०॥
मना मत्सरें नाम सांडूं
नको हो ।
अती आदरें हा निजध्यास
राहो ।
समस्तांमध्यें नाम हें
सार आहे ।
दुजी तूळणा तूळीतांही न
साहे ॥८१॥
बहू नाम या रामनामीं
तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हें
कळेना ।
विषा औषध घेतलें
पार्वतीशें ।
जिवा मानवा किंकरा कोण
पूसे ॥८२॥
जेणें जाळीला काम तो राम
ध्यातो ।
उमेसीं अती आदरें गूण
गातो ।
बहू ज्ञान वैराग्य
सामर्थ्य जेथें ।
परी अंतरीं नामविश्वास
तेथें ॥८३॥
विठोने शिरीं वाहिला
देवराणा ।
तया अंतरीं ध्यास रे
त्यासि नेणा ।
निवाला स्वयें तापसी
चंद्रमौळी ।
जिवां सोडवी राम हा
अंतकाळीं ॥८४॥
भजा राम विश्राम
योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम
गौरीहराचा ।
स्वयें नीववी तापसी
चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा
अंतकाळीं ॥८५॥
मुखीं राम विश्राम
तेंथेंचि आहे ।
सदानंद आनंद सेऊनि राहे
।
तयावीण तो सीण संदेहकारी
।
निजधाम हें नाम
शोकापहारी ॥८६॥
मुखीं राम त्या काम
बाधूं शकेना ।
गुणें इष्ट धारिष्ट
त्याचें चुकेना ।
हरीभक्त तो शक्त कामास
मारी ।
जगीं धन्य तो मारुती
ब्रह्मचारी ॥८७॥
बहू चांगलें नाम या
राघवाचें ।
अती साजिरें स्वल्प
सोपें फुकाचें ।
करी मूळ निर्मूळ घेतां
भवाचें ।
जिवां मानवां हेंचि
कैवल्य साचें ॥८८॥
जनीं भोजनीं नाम वाचे
वदावें ।
अती आदरें गद्य घोषें
म्हणावें ।
हरीचिंतनें अन्न जेवीत
जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो
स्वभावें ॥८९॥
न ये राम वाणी तया थोर
हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया
नाम काणी ।
हरीनाम हें वेदशास्त्रीं
पुराणीं ।
बहू आगळें बोलिली
व्यासवाणी ॥९०॥
नको वीट मानूं
रघूनायकाचा ।
अती आदरें बोलिजे राम
वाचा ।
न वेचे मुखीं सांपडे रे
फुकाचा ।
करीं घोष त्या
जानकीवल्लभाचा ॥९१॥
अती आदरें सर्व ही
नामघोषें ।
गिरीकंदरीं जाइजे दूर
दोषें ।
हरी तिष्ठतु तोषला
नामघोषें ।
विशेषें हरा मानसीं
रामपीसें ॥९२॥
जगीं पाहतां देव हा
अन्नदाता ।
तया लागली तत्वतां सार
चिंता ।
तयाचें मुखीं नाम घेता
फुकाचें ।
मना सांग पां रे तुझें
काय वेंचे ॥९३॥
तिन्ही लोक जाळूं शके
कोप येतां ।
निवाला हरू तो मुखें नाम
घेतां ।
जपे आदरें पार्वती
विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेंचि हें
नाम आतां ॥९४॥
अजामेळ पापी वदें
पुत्रकामें ।
तया मुक्ति नारायणाचेनि
नामें ।
शुकाकारणें कुंटणी राम
वाणी ।
मुखें बोलतां ख्याति
जाली पुराणीं ॥९५॥
महाभक्त प्रल्हाद हा
दैत्यकूळीं ।
जपे रामनामावळी
नित्यकाळीं ।
पिता पापरूपी तया
देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखें
म्हणेना ॥९६॥
मुखीं नाम नाहीं तया
मुक्ति कैंची ।
अहंतागुणें यातना ते
फुकाची ।
पुढें अंत येईल तो
दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा
देवराणा ॥९७॥
हरीनाम नेमस्त पाषाण
तारी ।
बहु तारिले मानवीदेहधारी
।
तया रामनामीं सदा जो
विकल्पी ।
वदेना कदा जीव तो
पापरूपी ॥९८॥
जगीं धन्य वाराणसी
पुण्यरासी ।
तयेमाजिं जातां गती
पूर्वजांसी ।
मुखें रामनामावळी
नित्यकाळीं ।
जिवा हीत सांगे सदा
चंद्रमौळी ॥९९॥
येथासांग रे कर्म तेंहि
घडेना ।
घडे कर्म तें पुण्य
गांठीं पडेना ।
दया पाहतां सर्वभूतीं
असेना ।
फुकाचें मुखीं नाम तेंही
वसेना ॥१००॥
जया नावडे नाम त्या यम
जाची ।
विकल्पें उठे तर्क त्या
नर्क ची ची ।
म्हणोनी अति आदरें नाम
घ्यावें ।
मुखें बोलतां दोष जाती
स्वभावें ॥१०१॥
अती लीनता सर्वभावें
स्वभावें ।
जना सज्जनांलागि
संतोषवावें ।
देहे कारणीं सर्व लावीत
जावें ।
सगूणी अती आदरेंसीं
भजावें ॥१०२॥
हरीकीर्तनें प्रीति
रामीं धरावी ।
देहेबुद्धि निरूपणीं
वीसरावी ।
परद्रव्य आणीक कांता
परावी ।
येदर्थीं मना सांडि
जीवीं करावी ॥१०३॥
क्रियेवीण नानापरी
बोलिजेतें ।
परी चित्त दुश्चीत तें
लाजवीतें ।
मना कल्पना धीट सैराट
धांवे ।
तया मानवा देव कैसेनि
पावे ॥१०४॥
विवेकें क्रिया आपुली
पालटावी ।
अती आदरें शुद्ध क्रीया
धरावी ।
जनीं बोलण्यासारिखें चाल
बापा ।
मना कल्पना सोडिं
संसारतापा ॥१०५॥
बरी स्नानसंध्या करीं
येकनिष्ठा ।
विवेकें मना आवरी
स्थानभ्रष्टा ।
दया सर्व भूतीं जया
मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावें
निवाला ॥१०६॥
मना कोपआरोपणा ते नसावी
।
मना बुद्धि हे साधुसंगीं
वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग
त्यागी ।
मना होई रे मोक्षभागीं
विभागी ॥१०७॥
सदा सर्वदा सज्जनाचेनि
योगें ।
क्रिया पालटे
भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते
निवारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१०८॥
जनीं वादवेवाद सोडूनि
द्यावा ।
जनीं सूखसंवाद सूखें
करावा ।
जनीं तोचि तो
शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१०९॥
तुटे वाद संवाद त्यातें
म्हणावें ।
विवेकें अहंभाव यातें
जिणावें ।
अहंतागुणें वाद नाना
विकारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥११०॥
हिताकारणें बोलणें सत्य
आहे ।
हिताकारणें सर्व शोधूनि
पाहे ।
हिताकारणें बंड पाखांड
वारीं ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१११॥
जनीं सांगतां ऐकतां जन्म
गेला ।
परी वाद वेवाद तैसाचि
ठेला ।
उठे संशयो वाद हा
दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥११२॥
जनीं हीत पंडीत सांडीत
गेले ।
अहंतागुणें ब्रह्मराक्षस
जाले ।
तयांहूनि व्युत्पन्न तो
कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि
राहें ॥११३॥
फुकाचें मुखीं बोलतां
काय वेंचे ।
दिसेंदीस अभ्यंतरीं गर्व
सांचे ।
क्रियेवीण वाचाळतां
व्यर्थ आहे ।
विचारें मना तूंचि शोधून
पाहे ॥११४॥
तुटे वाद संवाद तेथें
करावा ।
विवेकें अहंभाव हा
पालटावा ।
जनीं बोलण्यासारिखें
आचरावें ।
क्रियापालटें
भक्तिपंथेचि जावें ॥११५॥
बहू श्रापितां कष्टला
अंबऋषी ।
तयाचे स्वयें श्रीहरी
जन्म सोशी ।
दिल्हा क्षीरसिंधू तया
ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११६॥
धुरुं लेकरूं बापुडें
दैन्यवाणें ।
कृपा भाकिता दीधली भेटि
जेणें ।
चिरंजीव तारांगणीं
प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११७॥
गजेंद्रू महासंकटिं वाट
पाहे ।
तयाकारणें श्रीहरी
धांवताहे ।
उडी घातली जाहला जीवदानी
।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११८॥
अजामेळ पापी तया अंत आला
।
कृपाळूपणें तो जनीं
मुक्त केला ।
अनाथासि आधार हा
चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११९॥
विधीकारणें जाहला मत्स्य
वेगीं ।
धरी कूर्मरूपें धरा
पृष्ठभागीं ।
जना रक्षणाकारणें नीच
योनी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२०॥
महा भक्त प्रल्हाद हा
कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणें सिंह
जाला ।
न ये ज्वाळ वीशाळ
संन्नीध कोण्ही ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२१॥
कृपा भाकितां जाहला
वज्रपाणी ।
तयाकारणें वामनु
चक्रपाणी ।
द्विजाकारणें भार्गव
चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२२॥
अहिल्ये सतीलागि
आरण्यपंथें ।
कुडावा पुढें देव बंदीं
तयांतें ।
बळें सोडितां घाव घाली
निशाणीं ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२३॥
तये द्रौपदीकारणें
लागवेगें ।
त्वरें धांवतू सर्व
सांडूनि मागें ।
कळीलागि जाला असें बोद्ध
मौनी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२४॥
अनाथां दिनां कारणें
जन्मताहे ।
कलंकी पुढें देव होणार
आहे ।
जया वर्णितां सीणली
वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२५॥
जनाकारणें देव लीळावतारी
।
बहूतांपरीं आदरें
वेषधारी ।
तया नेणती ते जन पापरूपी
।
दुरात्मे महानष्ट चांडाळ
पापी ॥१२६॥
जगीं धन्य तो रामसूखें
निवाला ।
कथा ऐकतां सर्व तल्लीन
जाला ।
देहेभावना रामबोधें
उडाली ।
मनोवासना रामरूपीं
बुडाली ॥१२७॥
मना वासना वासुदेवीं
वसों दे ।
मना कामना कामसंगीं नसों
दे ।
मना कल्पना वाउगी ते न
कीजे ।
मना सज्जना सज्जनीं
वस्ति कीजे ॥१२८॥
गतीकारणें संगती
सज्जनाची ।
मती पालटे सूमती
दुर्जनाची ।
रतीनायकाचा पती नष्ट आहे
।
म्हणोनी मनातीत होऊनि
राहे ॥१२९॥
मना अल्प संकल्प तो ही
नसावा ।
सदा सत्य संकल्प चित्तीं
वसावा ।
जनीं जल्प वीकल्प तोही
त्यजावा ।
रमाकांत येकांतकाळीं
भजावा ॥१३०॥
भजाया जनीं पाहतां राम
येकू ।
करीं बाण येकू मुखीं
शब्द येकू ।
क्रिया पाहतां उद्धरे
सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू
॥१३१॥
विचारूनि बोले विवंचूनि
चाले ।
तयाचेनि संतप्त तेही
निवाले ।
बरें शोधल्यावीण बोलों
नको हो ।
जनीं चालणें शुद्ध
नेमस्त राहो ॥१३२॥
हरीभक्त वीरक्त
विज्ञानराशी ।
जेणें मानसीं स्थापिलें
निश्चयाशीं ।
तया दर्शनें स्पर्शनें
पुण्य जोडे ।
तया भाषणें नष्ट संदेह
मोडे ॥१३३॥
नसे गर्व आंगीं सदा
वीतरागी ।
क्षमा शांति भोगी
दयादक्ष योगी ।
नसे लोभ ना क्षोभ ना
दैन्यवाणा ।
इहीं लक्षणीं जाणिजे
योगिराणा ॥१३४॥
धरीं रे मना संगती
सज्जनाची ।
जेणें वृत्ति हे पालटे
दुर्जनाची ।
बळें भाव सद्बुद्धि
सन्मार्ग लागे ।
महा क्रूर तो काळ
विक्राळ भंगे ॥१३५॥
भयें व्यापिलें सर्व
ब्रह्मांड आहे ।
भयातीत तें संत आनंत
पाहें ।
जया पाहतां द्वैत कांहीं
दिसेना ।
भय मानसीं सर्वथा ही
असेना ॥१३६॥
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट
सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि
ठेले ।
देहेबुद्धिचें कर्म
खोटें टळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१३७॥
भ्रमें नाडळे वित्त तें
गुप्त जालें ।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि
आलें ।
देहेबुद्धिचा निश्चयो
ज्या टळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१३८॥
पुढें पाहतां सर्व ही
कोंदलेंसे ।
अभाग्यास हें दृश्य
पाषाण भासे ।
अभावें कदा पुण्य गांठी
पडेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१३९॥
जयाचें तया चूकलें
प्राप्त नाहीं ।
गुणें गोविलें जाहलें
दुःख देहीं ।
गुणावेगळी वृत्ति तेही
वळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१४०॥
म्हणे दास सायास त्याचे
करावे ।
जनीं जाणता पाय त्याचे
धरावे ।
गुरुअंजनेवीण तें आकळेना
।
जुनें ठेवणें मीपणें तें
कळेना ॥१४१॥
कळेना कळेना कळेना ढळेना
।
ढळे नाढळे संशयो ही ढळेना
।
गळेना गळेना अहंता गळेना
।
बळें आकळेना मिळेना
मिळेना ॥१४२॥
अविद्यागुणें मानवा
ऊमजेना ।
भ्रमें चूकलें हीत ते
आकळेना ।
परीक्षेविणें बांधलें
द्ृढ नाणें ।
परी सत्य मिथ्या असें
कोण जाणे ॥१४३॥
जगीं पाहतां साच तें काय
आहे ।
अती आदरें सत्य शोधूनि
पाहें ।
पुढें पाहतां पाहतां देव
जोडे ।
भ्रमें भ्रांति अज्ञान
हें सर्व मोडे ॥१४४॥
सदा वीषयो चिंतितां जीव
जाला ।
अहंभाव अज्ञान जन्मासि
आला ।
विवेकें सदा स्वस्वरूपीं
भरावें ।
जिवा ऊगमीं जन्म नाहीं
स्वभावें ॥१४५॥
दिसे लोचनीं तें नसे
कल्पकोडी ।
अकस्मात आकारलें काळ मोडी
।
पुढें सर्व जाईल कांहीं
न राहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहे ॥१४६॥
फुटेना तुटेना चळेना
ढळेना ।
सदा संचलें मीपणें तें
कळेना ।
तया एकरूपासि दुजें न
साहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१४७॥
निराकार आधार
ब्रह्मादिकांचा ।
जया सांगतां सीणली
वेदवाचा ।
विवेकें तदाकार होऊनि
राहें ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१४८॥
जगीं पाहतां चर्मचक्षीं
न लक्षे ।
जगीं पाहतां ज्ञानचक्षीं
नरक्षे ।
जगीं पाहतां पाहणें जात
आहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१४९॥
नसे पीत ना श्वेत ना
श्याम कांहीं ।
नसे व्यक्त अव्यक्त ना
नीळ नाहीं ।
म्हणे दास विश्वासतां
मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१५०॥
खरें शोधितां शोधितां
शोधताहे ।
मना बोधितां बोधितां
बोधताहे ।
परी सर्व ही सज्जनाचेनि
योगें ।
बरा निश्चयो पाविजे
सानुरागें ॥१५१॥
बहूतांपरी कूसरी
तत्वझाडा ।
परी अंतरीं पाहिजे तो
निवाडा ।
मना सार साचार तें
वेगळें रे ।
समस्तांमधें येक तें
आगळें रे ॥१५२॥
नव्हे पिंडज्ञानें नव्हे
तत्वज्ञानें ।
समाधान कांहीं नव्हे
तानमानें ।
नव्हे योगयागें नव्हे
भोगत्यागें ।
समाधान तें सज्जनाचेनि
योगें ॥१५३॥
महावाक्य तत्वादिकें
पंचीकर्णें ।
खुणें पाविजे संतसंगें
विवर्णें ।
द्वितीयेसि संकेत जो
दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमा
भाविजेतो ॥१५४॥
दिसेना जनीं तेंचि
शोधूनि पाहें ।
बरें पाहतां गूज तेथेंचि
आहे ।
करीं घेऊं जातां कदा
आडळेना ।
जनीं सर्व कोंदाटलें तें
कळेना ॥१५५॥
म्हणे जाणता तो जनीं
मूर्ख पाहें ।
अतर्कासि तर्की असा कोण
आहे ।
जनीं मीपणें पाहतां
पाहवेना ।
तया लक्षितां वेगळें
राहवेना ॥१५६॥
बहू शास्त्र धुंडाळितां
वाड आहे ।
जया निश्चयो येक तोही न
साहे ।
मती भांडती शास्त्रबोधें
विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधें
प्रबोधें ॥१५७॥
श्रुति न्याय मीमांसकें
तर्कशास्त्रें ।
स्मृति वेद वेदान्तवाक्यें
विचित्रें ।
स्वयें शेष मौनावला
स्थीर राहे ।
मना सर्व जाणीव सांडून
पाहे ॥१५८॥
जेणें मक्षिका भक्षिली
जाणिवेची ।
तया भोजनाची रुची
प्राप्ति कैंची ।
अहंभाव ज्या मानसीचा
विरेना ।
तया ज्ञान हें अन्न
पोटीं जिरेना ॥१५९॥
नको रे मना वाद हा
खेदकारी ।
नको रे मना भेद नाना
विकारी ।
नको रे मना सीकऊं
पुढिलांसि ।
अहंभाव जो राहिला
तूजपासीं ॥१६०॥
अहंतागुणें सर्व ही दुःख
होतें ।
मुखें बोलिलें ज्ञान तें
व्यर्थ जातें ।
सुखी राहतां सर्वही सूख
आहे ।
अहंता तुझी तूंचि शोधूनि
पाहें ॥१६१॥
अहंतागुणें नीति सांडि
विवेकी ।
अनीतीबळें श्लाघ्यता
सर्व लोकीं ।
परी अंतरीं सर्वही साक्ष
येते ।
प्रमाणांतरें बुद्धि
सांडूनि जाते ॥१६२॥
देहेबुद्धिचा निश्चयो
दृढ जाला ।
देहातीत तें हीत सांडीत
गेला ।
देहेबुद्धि ते
आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६३॥
मनें कल्पिला वीषयो सोडवावा
।
मनें देव निर्गूण तो
वोळखावा ।
मनें कल्पितां कल्पना ते
सरावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६४॥
देहादीक प्रपंच हा
चिंतियेला ।
परी अंतरीं लोभ निश्चिंत
ठेला ।
हरीचिंतनें मुक्तिकांता
वरावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६५॥
अहंकार विस्तारला या
देहाचा ।
स्त्रियापुत्रमित्रादिकें
मोह त्यांचा ।
बळें भ्रांति हे
जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६६॥
बरा निश्चयो शाश्वताचा
करावा ।
म्हणें दास संदेह तो
वीसरावा ।
घडीनें घडी सार्थकाची
करावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६७॥
करी वृत्ति जो संत तो
संत जाणा ।
दुराशागुणें जो नव्हे
दैन्यवाणा ।
उपाधी देहेबुद्धितें
वाढवीते ।
परी सज्जना कवि बाधूं
शके ते ॥१६८॥
नसे अंत आनंत संता
पुसावा ।
अहंकार विस्तार हा
नीरसावा ।
गुणेंवीण निर्गूण तो
आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवो
नाठवावा ॥१६९॥
देहेबुद्धि हे
ज्ञानबोधें त्यजावी ।
विवेकें तये वस्तुची
भेटि घ्यावी ।
तदाकार हे वृत्ति नाहीं
स्वभावें ।
म्हणोनी सदा तेंचि शोधीत
जावें ॥१७०॥
असे सार साचार तें
चोरलेंसें ।
इहीं लोचनीं पाहतां
दृश्य भासे ।
निराभास निर्गूण तें
आकळेना ।
अहंतागुणें कल्पितांही
कळेना ॥१७१॥
स्फुरे वीषयीं कल्पना ते
अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण
माया सुविद्या ।
मुळीं कल्पना दोरुपें
तेचि जाली ।
विवेकें तरी स्वस्वरुपीं
मिळाली ॥१७२॥
स्वरुपीं उदेला अहंकार
राहो ।
तेणें सर्व आछ्यादिलें
व्योम पाहों ।
दिशा पाहतां ते निशा
वाढताहे ।
विवेकें विचारें
विवंचूनि पाहे ॥१७३॥
जया चक्षुनें लक्षितां
लक्षवेना ।
भवा भक्षितां रक्षितां
रक्षवेना ।
क्षयातीत तो अक्षयी
मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिनें
पक्ष घेतो ॥१७४॥
विधी निर्मितां लीहितो
सर्व भाळीं ।
परी लीहितो कोण त्याचे
कपाळीं ।
हरु जाळितो लोक
संहारकाळीं ।
परी सेवटीं शंकरा कोण
जाळी ॥१७५॥
जगीं द्वादशादित्य हे
रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण
शक्रा ।
जगीं देव धुंडाळितां
आढळेना ।
जनीं मुख्य तो कोण कैसा
कळेना ॥१७६॥
तुटेना फुटेना कदा
देवराणा ।
चळेना ढळेना कदा
दैन्यवाणा ।
कळेना कळेना कदा लोचनासी
।
वसेना दिसेना जनीं
मीपणासी ॥१७७॥
जया मानला देव तो
पूजिताहे ।
परी देव शोधूनि कोणी न
पाहे ।
जगीं पाहतां देव
कोट्यानकोटी ।
जया मानिली भक्ति जे
तेचि मोठी ॥१७८॥
तिन्हीं लोक जेथूनि
निर्माण जाले ।
त्या देवरायासि कोणी न
बोले ।
जगीं थोरला देव तो
चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न
दीसे ॥१७९॥
गुरु पाहतां पाहतां लक्ष
कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति
मोठी ।
मनीं कामना चेटकें
धातमाता ।
जनीं व्यर्थ रे तो नव्हे
मुक्तिदाता ॥१८०॥
नव्हे चेटकू चाळकू
द्रव्यभोंदू ।
नव्हे निंदकू मत्सरु
भक्तिमंदू ।
नव्हे उन्मतू व्यसनी
संगबाधू ।
जनीं ज्ञानिया तोचि साधू
अगाधु ॥१८१॥
नव्हे वाऊगी चाहुटी काम
पोटीं ।
क्रियेवीण वाचाळता तेचि
मोठी ।
मुखें बोलिल्यासारिखें
चालताहे ।
मना सद्गुरु तोचि शोधूनि
पाहे ॥१८२॥
जनीं भक्त ज्ञानी विवेकी
विरागी ।
कृपाळू मनस्वी क्षमावंत
योगी ।
प्रभू दक्ष व्युत्पन्न
चातुर्य जाणे ।
तयाचेन योगें समाधान
बाणे ॥१८३॥
नव्हे तेचि जालें नसें
तेंचि आलें ।
कळों लागलें सज्जनाचेनि
बोलें ।
अनिर्वाच्य तें वाच्य
वाचे वदावें ।
मना संत आनंत शोधीत
जावें ॥१८४॥
लपावें अती आदरें
रामरूपीं ।
भयातीत निश्चिंत ये
स्वस्वरूपीं ।
कदा तो जनीं पाहतांही
दिसेना ।
सदा ऐक्य तो भिन्नभावें
वसेना ॥१८५॥
सदा सर्वदा राम सन्नीध
आहे ।
मना सज्जना सत्य शोधून
पाहे ।
अखंडीत भेटी रघूराजयोगु
।
मना सांडि रे मीपणाचा
वियोगु ॥१८६॥
भुतें पिंड ब्रह्मांड
हें ऐक्य आहे ।
परी सर्वही स्वस्वरूपीं
न साहे ।
मना भासलें सर्व कांहीं
पहावें ।
परी संग सोडूनि सूखीं
रहावें ॥१८७॥
देहेभान हें
ज्ञानशस्त्रें खुडावें ।
विदेहीपणें
भक्तिमार्गेंचि जावें ।
विरक्तीबळें निंद्य
सर्वै त्यजावें ।
परी संग सोडूनि सूखें
रहावें ॥१८८॥
मही निर्मिली देव तो
वोळखावा ।
जया पाहतां मोक्ष तत्काळ
जीवा ।
तया निर्गुणालागि गूणी
पहावें ।
परी संग सोडूनि सूखें
रहावें ॥१८९॥
नव्हे कार्यकर्ता नव्हे
सृष्टिभर्ता ।
परेहूनि पर्ता न लिंपे
विवर्ता ।
तया निर्विकल्पासि
कल्पीत जावें ।
परी संग सोडूनि सूखें
रहावें ॥१९०॥
देहेबुद्धिचा निश्चयो
ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळीं
कळेना ।
परब्रह्म तें मीपणें
आकळेना ।
मनीं शून्य अज्ञान हें
मावळेना ॥१९१॥
मना ना कळे ना ढळे रूप
ज्याचें ।
दुजेवीण तें ध्यान
सर्वोत्तमाचें ।
तया खूण ते हीण
द्ृष्टांत पाहे ।
तेथें संग निःसंग दोनी न
साहे ॥१९२॥
नव्हे जाणता नेणता
देवराणा ।
न ये वर्णितां
वेदशास्त्रा पुराणा ।
नव्हे दृश्य अदृश्य
साक्षी तयाचा ।
श्रुति नेणती नेणती अंत
त्याचा ॥१९३॥
वसे हृदईं देव तो कोण
कैसा ।
पुसे आदरें साधकू प्रश्न
ऐसा ।
देहे टाकितां देव कोठे
रहातो ।
परी मागुता ठाव कोठें
पहातो ॥१९४॥
वसे हृदईं देव तो जाण
ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू जाण
तैसा ।
सदा संचला येत ना जात
कांहीं ।
तयावीण कोठें रिता ठाव
नाहीं ॥१९५॥
नभीं वावरे जो अणुरेणु
कांहीं ।
रिता ठाव या राघवेंवीण
नाहीं ।
तया पाहतां पाहतां तेंचि
जालें ।
तेथें लक्ष आलक्ष सर्वे
बुडालें ॥१९६॥
नभासारिखें रूप या
राघवाचें ।
मनीं चिंतितां मूळ तूटे
भवाचें ।
तया पाहतां देहबुद्धी
उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटीं
पुरेना ॥१९७॥
नभें व्यापिलें सर्व
सृष्टीस आहे ।
रघूनायका उपमा ते न साहे
।
दुजेवीण जो तोचि तो हा
स्वभावें ।
तया व्यापकू व्यर्थ
कैसें म्हणावें ॥१९८॥
अतीजीर्ण विस्तीर्ण तें
रूप आहे ।
तेथें तर्कसंपर्क तोही न
साहे ।
अती गूढ तें दृढ तत्काळ
सोपें ।
दुजेवीण जें खूण
स्वामिप्रतापें ॥१९९॥
कळे आकळे रूप तें ज्ञान
होतां ।
तेथें आटली सर्वसाक्षी
अवस्था ।
मना उन्मनीं शब्द कुंठीत
राहे ।
तो गे तोचि तो राम
सर्वत्र पाहे ॥२००॥
कदा वोळखीमाजि दूजें
दिसेना ।
मनीं मानसीं द्वैत
कांहीं वसेना ।
बहूतां दिसां आपुली भेटि
जाली ।
विदेहीपणें सर्व काया
निवाली ॥२०१॥
मना गूज रे तूज हें
प्राप्त जालें ।
परी अंतरीं पाहिजे यत्न
केले ।
सदा श्रवणें पाविजे
निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य
होसी ॥२०२॥
मना सर्वही संग सोडूनि
ध्यावा ।
अती आदरें सज्जनाचा
धरावा ।
जयाचेनि संगें महादुःख
भंगे ।
जनीं साधनेंवीण सन्मार्ग
लागे ॥२०३॥
मना संग हा सर्व संगास
तोडी ।
मना संग हा मोक्ष तत्काळ
जोडी ।
मना संग हा साधकां सीघ्र
सोडी ।
मना संग हा द्वैत निःशेष
मोडी ॥२०४॥
मनाची शतें ऐकतां दोष
जाती ।
मतीमंद ते साधना योग्य
होती ।
चढे ज्ञान वैराग्य
सामर्थ्य अंगीं ।
म्हणे दास विश्वासतां
मुक्ति भोगी ॥२०५॥
समर्थ रामदास-