पिठोरी अमावास्या : महत्व आणि संदेश : मातृदिन
श्रावणाचा अखेरचा दिवस, दर्श वा पिठोरी अमावास्या. हा दिवस जसा पोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणूनही. आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा, मोठी परंपरा असलेला हा दिवस. या दिवशी घरी खीरपुरी करतात. घरात जेवढ्या व्यक्ती असतात, तेवढ्या खिरीच्या वाट्या पुरीने झाकून, आई विचारते, "अतिथी कोण ?" आईच्या मागे उभा असलेला मी म्हणतो, "आई मी उपेन", मग, पुरीने झाकलेली खिरीची वाटी, आई माझ्या म्हणजे अतिथीच्या हाती देते, मी आईला नमस्कार करतो, अतिथीची इच्छा पूर्ण करणं, हा या पिठोरीच्या व्रताचा संदेश. ....
पिठोरी अमावास्येचं हे व्रत, आई आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी, संवर्धनासाठी करते. विदेहा नावाच्या स्त्रीची संतती जगत नव्हती. तिने पिठोरी अमावास्येचं व्रत केलं, चौसष्ट योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाली अशी पिठोरी अमावास्येची कहाणी आहे. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन केले जाते .
चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करावी. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. आणि म्हणून यादिवशी मातृदिन साजरा करण्याची आपली संस्कारी परंपरा आहे
Upendra Chinchore