*.. व्यंकटेश विजय ..*
____________🔺____________
*अध्याय :- २..*
मागील अध्यायात शतानंद गौतमांनी व्यंकटगिरीचा महिमा सांगून चारही युगात तो निरनिराळ्या नावांनी प्रसिद्धीस आला आहे असे सांगितले. तेव्हा राजाने एकाच पर्वतास भिन्न भिन्न काळी अशी निराळी नावे का पडली असा प्रश्न केला; तेव्हा शतानंद गौतमांनी तो इतिहास सांगण्यास सुरुवात केली.
राजा ! कृतयुगात याला वृषभाद्री नाव पडण्याचे कारण आता तुला मी सांगतो; ते ऐक.
पूर्वी वृषभ नावाचा एक फार भयंकर राक्षस होता. तो लोकांना फारच त्रास देतसे. त्याचे आचरण वाईट होते. तो एकदा या पर्वतावर आला. त्याने आपल्या कपाळास शेंदूर फासला होता. त्याचे तोंड फार मोठे होते. त्याला पांढरी शुभ्र लांब दाढी होती. वर्णाने तो अतिशय काळा असल्याने काळापर्वतच असा तो भासत होता. तोंडातून जीभ बाहेर काढून तो जेव्हा फिरत असे तेव्हा लोक भयाने घाबरत असत. असा हा उन्मत्त राक्षस या पर्वतावरील तुंबर तीर्थावर राहत असे. ब्राह्मण याच्या भीतीने थरथरा कापत असत. ब्राह्मणाचे स्नान संध्या ध्यान अध्यापन होमहवनदि सर्व कर्म याच्या भीतीने बंद पडले. केव्हातरी सर्व ब्राह्मण मंडळी आपापल्या अनुष्ठात मग्न होऊन बसत. त्यावेळी याचे भयंकर ओरडणे ऐकू आले की त्याचे मन चलबिचल होतेसे.
याप्रकारे तो वृषभ राक्षस जरी महाभयंकर होता, तरी तो विष्णुभक्त असून नरसिंह शालिग्रामाची पूजा फार भक्तीने करीत असे. पूजेच्यावेळी अतिशय प्रेमाने आपले मस्तक तोडुन विष्णूस समर्पण करीत असे. भगवान विष्णूंनीही त्याच्या प्रेमाने त्यास पुनः सजीव करावे. असे पाच हजार वर्षे त्याचे तप चालले होते. सर्व लोक त्याच्या उग्रपणास फार घाबरले होते, तेव्हा त्यांनी आता आम्हांस या संकटातुन कोण सोडविणार? आता कोणास शरण जावे? या राक्षसाचा नाश कोण करिल असा विचार करीत असता त्यांनी ठरविले की, एका भगवंतावाचून आमचे रक्षण कोण करील ! त्यानेच जर मनावर घेतले तरच आमचे रक्षण होईल, मग त्या ब्राह्मणांनी स्नाने वगैरे केली व पर्वताच्या शिखरावर ते चढले. तेथे जाऊन त्यांनी भगवंताची एकाग्र मनाने स्तुती केली, त्यांची स्तुति ऐकून भगवान गरुडावर बसुन तेथे आले. त्यांचे ते स्वरूप अत्यंत सुंदर व तेजस्वी पाहून सर्वांना फार आनंद झाला. सर्व ब्राह्मणांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व स्तुती केली. त्यांची ती स्तुती ऐकून भगवान प्रसन्न झाले व त्यांनी ब्राह्मणांना घाबरू नका असा वर दिला. तुमचे कल्याण होईल. नंतर भगवान विष्णु राक्षसाकडे आले. त्यानेही भगवंताला पाहून नमस्कार केला व स्तुतीने त्यांना संतुष्ट केले. संतुष्ट भगवंताना पाहून राक्षस म्हणाला, देवा मला राज्य वगैरे काही वैभव नको. माझे हे बाहू स्फुरण पावतत तेव्हा मला युद्धभिक्षा दे. मला तुझ्याबरोबर लढाई करावी असे वाटते. भगवंतांनी त्यास तथास्तु म्हणून त्याच्याबरोबर घनघोर युद्ध केले. त्रैलोक्यावर त्या युद्धाचा परिणाम झाला. देव, माणसे वगैरे सर्व घाबरून गेले. असे युद्ध सुरू असता याचा मला पराजय करता येत नाही हा साक्षात भगवान भक्तरक्षणाकरिता अवतरला आहे असे राक्षसास वाटले. शेवटी श्रीभगवंतांनी आपले सुदर्शनचक्र त्यावर टाकले व त्याचे मस्तक तोडले. सर्वत्र आनंदीआनंद झाला. सर्व लोक सुखी झाले. भगवान वैकुंठास परत गेले.
नंतर शतानंद गौतमांनी राज्याच्या प्रश्नाप्रमाणे त्रेतायुगात याला अंजनाद्री असे नाव का मिळाले ती हकीकत सांगितली ती तिसर्या अध्यायात पाहू...
〰〰〰〰〰〰
*सं- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*