Blog Views

श्री व्यंकटेश विजय भाग 3

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*ॐ नमो श्री व्यंकटेशाय नम :💐💐🌷🌷🙏🙏🚩🚩🚩*

*.. व्यंकटेश विजय ..*
__________🔺___________

अध्याय ३..

शतानंद गौतमांनी राजास अंजनाद्रि नावाचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी त्रेतायुगात केसरी नावाचा एक वानर होता. त्याची अंजनी नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिला संतती नसल्याने ती नेहमी काळजीत असे. एके दिवशी मतंग नावाचे एक ऋषि तिच्या आश्रमास आले. त्यांचा तिने योग्य आदरसत्कार करून आपली हकीगत तिने त्यांना सांगितली. मतंगऋषींनी तिजवर कृपा करून तिला सांगितले की, तू काळजी करू नकोस. तुझे कल्याण होवो. तुला मी एक युक्ति सांगतो. येथून थोड्या अंतरावर स्वामी तीर्थापासून एक कोस अंतरावर आकाशगंगा नावाचे तीर्थ आहे. तेथे जाऊन तू बारा वर्षे भगवंताची तपश्चर्या कर. म्हणजे तुला पुत्र होईल.

हे ऐकून अंजनी ऋषीच्या आज्ञेप्रमाणे तेथे जाऊन दीर्घ काल फार उग्र असे तप करू लागली. तिने सर्व काही सोडून दिले. तपाने तिचे शरीर लाकडासारखे झाले. अशी बारा वर्षे पूर्ण झाली; तेव्हा एक आश्चर्य घडले. ती ओंजळ करून ध्यान करण्यात मग्न झाली असता प्रत्यक्ष वायुदेवतेने येऊन तिच्या हातात एक फळ टाकले. तो प्रसाद म्हणून अंजनिने भक्षण केला. ती त्यामुळे गर्भवती झाली. दहा महिने पूर्ण होताच तिला एक तेजस्वी व पराक्रमी पुत्र झाला तेच रामदुत हनुमंत. या पर्वतावर अंजनीमातेने तप करून भगवंताकडून प्रसाद मिळविला म्हणून याला अंजनाद्रि असे म्हणतात.

यानंतर द्वापार युगा त्याला शेषाचल असे नाव मिळाले आहे. शतानंदांनी ती हकीकत राजा जनकास सांगण्यास सुरुवात केली.

एकदा भगवान विष्णु लक्ष्मीसह एकांतात होते. द्वारपाल जय व विजय यांना सनकादिकांनी शाप दिल्यामुळे ते राक्षस योनीत जन्मास आहे होते. त्यावेळी द्वाररक्षणाच्या कामावर महाशेषाची योजना झाली होती. त्यावेळी वायुदेव भगवंताच्या दर्शनास आले असता श्रीशेषांनी त्याला अडविले. वायूने त्यास सांगितल, येथे भगवंताच्या राज्यात कोणासही अडथळा नसता तू का अडवतोस. शेषांनी आपला अधिकार सांगितला. आपण माझे ऐकले पाहिजे असे सांगितले. दोघांच पुष्कळ वादविवाद झाला. तो वादविवाद ऐकून श्रीमहालक्ष्मी बाहेर आली. तिने श्रीविष्णूंना दोघांचे भांडण सांगितले. भगवान बाहेर आले. दोघांनी त्यांना पाहून नमस्कार केला. शेषांनी आपली योग्यता व वायूची अयोग्यता सांगितली. त्यावेळी भगवान म्हणाले, उगाच कलह का! शेषा येथून उत्तरेकडे मेरुःपर्वताचा पुत्र जो एक पर्वत आहे त्याला तू वेढून घट्ट धरून राहा. त्यावेळी वायू त्याला उडविण्याचा प्रयत्न करील व मग श्रेष्ठ कोण हे ठरेल. दोघांनीही ही गोष्ट मान्य केली व स्पर्धेस सुरवात झाली. सर्व देवदानव मानव वगैरे सर्व पाहाण्यास आले. शेषाने आपल्या शरिराने तो पर्वत घट्ट धरला. तेव्हा भगवंतांनी वायूला तो उडविण्यास सांगितले असता त्यांनी केवळ आपल्या करांगुलीने त्या पर्वतास शेषांसह उडवून टाकले. तेथून तो फार लांबवर जाऊन पडला. सर्वांना फार आश्चर्य वाटले. सर्वांनी वायूची स्तुती केली. शेषाचा गर्व परिहार झाला. त्यांनी भगवंताची स्तुति केली. वायू देवतेची क्षमा मागितली. भगवंतांनी सर्वांना आशीर्वाद दिला. अभिमान कोणासही नसावा असे सांगितले. शेषांनी या पर्वताला वेढल्यामुळे या पर्वताला शेषाचल असे नाव पडले आहे.
〰〰〰〰〰〰📕
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs