Blog Views

श्री व्यंकटेश विजय भाग 5

*.. व्यंकटेश विजय ..*

अध्याय :- ५..

मागील अध्यायात माधव नावाचा ब्राह्मण सर्व पापांपासून मुक्त झाला म्हणून या पर्वताला 'वेंकटाद्रि' असे नाव पडले. ह्यानंतर पुन्हा शौनक ऋषींनी सूताना प्रश्न केला असताना लक्ष्मीकांत माधव वैकुंठ सोडून का आले ही हकीकत आम्हाला सांगा. तेव्हा सूतांनी सांगण्यास आरंभ केला.

एकदा सर्व ऋषींनी मिळून गंगेच्या काठी मोठा यज्ञ सुरू केला. यज्ञमंडप सुंदर घातला होता. तेथे कश्यप अत्री, विश्वामित्र वसिष्ठ इत्यादि विद्वान ब्राह्मण आले होते. इतक्यात येथे नारदमुनी आले. सर्व ऋषींनी व ब्राह्मणाने नारदाची पूजा करुन त्यांना उत्तम आसनावर बसविले; त्यावेळी नारदांनी ऋषींना प्रश्न केला की, तुम्ही हा यज्ञ जो सुरू केला आहे त्याचे फळ काय? सर्व देवतात श्रेष्ठ देव कोण आहे? याचा उपयोग काय हे मला सांगा.

त्यावेळी ऋषी म्हणाले, याचे श्रेय कोणाला द्यावे हे अद्याप आम्हाला कळले नाही. तेव्हा नारद म्हणाले, तुम्हाला जर कळत नाही तर यज्ञाचा उपयोग काय? हे नारदाचे बोलणे ऐकून सर्व ऋषींनी भृगु ऋषीला बोलावून सांगितले की, तुम्ही स्वर्गात जाऊन सर्व देवात श्रेष्ठ कोण याचा विचार करून लवकर या.

भृगु ऋषी सत्यलोकाला गेले. तेथे ब्रह्मदेव होते. सर्व देव त्याची स्तुती करीत होते. भृगु ऋषी तेथे गेला असताना त्याला कोणी विचारले नाही. भृगु ऋषींना राग आला, याला अभिमान झाला आहे हा सर्वज्ञ नाही. त्यामुळे हा यज्ञभोक्ता नाही असे ठरवून भृगु ऋषी तेथून निघाले ते कैलासावर आले. तेथेही त्यांना कोणी विचारले नाही. उलट संमति न घेताना ऋषी येथे आला म्हणून शंकर त्रिशूळ घेऊन त्याच्यावर धावले, भृगु ऋषी म्हणाले हा तामसी आहे. त्यांनी त्याला शाप दिला, तुझी पूजा कोणी करणार नाही. तुझ्या लिंगाची पूजा करतील. तेथून तो वैकुंठाला गेला. तेथे लक्ष्मीसहित विष्णू बसले होते. तेथे त्याला कोणी विचारले नाही. म्हणून ऋषीला राग आला व त्याने विष्णूच्या छातीवर लाथ मारली. लगेच विष्णू उठले व ऋषीचे पाय धरून वंदन केले. मी अपराधी आहे. मला आपण शासन केले चांगले झाले. माझा देह कठीण, आपला पाय दुखवला असेल म्हणून विष्णूने त्याच्या पायाला तेल लावून पाणी घातले व पूजा केली. विष्णूचा हा आदर पाहून ऋषींना वाटले. दयासागर विष्णू ही सत्यगुणी देवता आहे. म्हणून त्याचि स्तुती केली. सर्व देवतात हा श्रेष्ठ आहे.

नंतर भृगु ऋषी यज्ञस्थानी आले. विष्णु श्रेष्ठ आहे असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी भृगुनी विष्णूला लाथ मारली त्यावेळी विष्णूने ऋषींचे पूजन केले. हे पाहून लक्ष्मीने विष्णुला प्रश्न केला, देवा आपण सर्व देवात श्रेष्ठ आहात. भृगुने तुम्हाला लाथ मारली असता राग का नाही आला? त्यावेळी विष्णू म्हणाले देवी भृगु ऋषी तपस्वी ब्राह्मण आहे. ब्राह्मण हे माझे मुख्य दैवत आहे. तो माझा भक्त आहे. भक्त हे माझे आवडते आहेत. म्हणून मी त्याचा पाय भूषण म्हणून माझ्या वक्षःस्थलावर धारण करतो. हे ऐकून लक्ष्मीला राग आला. मला हे आवडत नाही. विष्णूस सोडून लक्ष्मी पृथ्वीवर येऊन कोल्हापूरास राहिली.

कोल्हापूर म्हणजे करवीर क्षेत्र. हे पंचगंगेच्या काठी आहे. पुण्यक्षेत्र म्हणून फार प्रसिद्ध आहे. लक्ष्मी आपणा सोडून गेली म्हणून त्यांना बरे वाटेना. त्यांनी सर्व पदार्थांचा त्याग केला. उदासीन होऊन वैकुंठाचा त्याग करून विष्णूही पृथ्वीवर आले. निरनिराळ्या ठिकाणी शोध करीत ते दक्षिण दिशेला आले. प्रवरानदीच्या उत्तरेला वैंकटगिरी या नावाचा शंभर योजन लांब आणि तीस मैल रुंद असा मेरू पर्वताचा मुलगा म्हणून जो प्रसिद्ध आहे अशा वेंकट पर्वतावर ते आले. त्याला भूवैकुंठ म्हणतात. त्यांना ते स्थान आवडले. अनेक प्रकारची अरण्ये, पक्षे, हिंस्त्र प्राणी, कस्तुरी मृग अनेक तीर्थे त्या ठिकाणी आहेत. त्या तीर्थाजवळ एक चिंचेचे झाड असून तेथे एक वारुळ होते. त्या वारुळात शिरून भगवान त्या ठिकाणी गुप्त रूपाने राहिले. तेथे ते दहा हजार वर्षे होते.

सर्व देवास चिंता पडली; आता देवास कोठे शोधावे? सर्व देवांनी ब्रह्मदेवाला विचारले, श्रीहरींना कोठे शोधावे. ब्रह्मदेवाने आपल्या मनामध्ये विचार केला आणि करवीर क्षेत्रात जाऊन लक्ष्मीला ही हकीकत सांगितली. तू सोडून गेल्यापासून श्रीहरी कोठे दिसेना. त्याचा शोध कोठे करावा व सर्व देवांना बरोबर घेऊन महादेवी लक्ष्मी श्रीविष्णूच्या शोधात निघाले.

सर्व देवास चिंता पडली; आता देवास कोठे शोधावे? सर्व देवांनी ब्रह्मदेवाला विचारले. श्रीहरींना कोठे शोधवे. ब्रह्मदेवाने आपल्या मनामध्ये विचार केला आणि करवीर क्षेत्रात जाऊन लक्ष्मीला ही हकीकत सांगितली. तू सोडून गेल्यापासून श्रीहरी कोठे दिसेना. त्याचा शोध कोठे करावा व सर्व देवांना बरोबर घेऊन महादेवी लक्ष्मी श्रीविष्णूच्या शोधात निघाले. सर्व ठिकाणी शोध केला पण कोठेही विष्णूचा पत्ता लागेना. त्यावेळी ब्रह्मदेवाने गायीचे रूप धारण केले. स्वतः शंकराने वासराचे रूप घेतले. गोपीचा वेष लक्ष्मीने घेतला. सर्वजण विष्णूचा शोध करण्याकरिता या पृथ्वीवर आले. शोध करता करता चोल राजाच्या राज्यात ते आले. तो राजा धार्मिक होता. ही गायवासरू त्या राज्यामध्ये हिंडत असताना त्या गायीला पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले. असली सुंदर गाय येथे कशी आली व ही कोणाची काही समजेना. राजाला ही हकीकत समजली. त्यांनी ती गाय आणवली. त्यालाही आनंद झाला. राजाने गौळणीला विचारले. तिने सांगितले ही गाय विकावयास आणिली आहे. राजाने द्रव्य देऊन ती विकत घेतली व आपल्या गायीच्या कळपात असताना एकदा या वैंकट पर्वतावर गवळ्यांनी ती गाय चरावयास नेली. त्या गायीने गवत भरपूर खाल्ले व पाणी पिण्यास म्हणून स्वामीतीर्थावर गेली. तेथे चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारुळातून सुंदर सुवास येत असलेला गायीस आढळला. ब्रह्मदेवाने तो सुवास ओळखला. येथेच श्री विष्णू आहेत असे त्यांनी ओळखले. ब्रह्मदेवगायीने त्या वारूळावर दुधाचा अभिषेक केला याप्रमाणे रोज तेथे येऊन ती गाय आपल्या दुधाचा अभिषेक करीत असे. असे होत असताना एके दिवशी त्या गायीची धार काढण्यास सांगितले असताना थोडेहि दूध निघेना. ती त्या गवळ्यास बोलू लागली. गवळ्यास तिने मारविले. त्यांनी ठरविले की त्या गायीच्या दुधाचे काय होते ते पाहू.

एकदा तो गवळी सर्व गायींना पाणी पाजवून सावलीत बसला असताना ती गाय त्या वारूळावर जाऊन आपल्या दुधाचा अभिषेक करते आहे हे पाहून त्याला राग आला. हिच्यामुळे आपल्याला शिक्षा भोगावी लागली असे म्हणून हिला मारून टाकतो असे म्हणून तो हातात कुर्‍हाड घेऊन तो तिला मारण्यास धावला हे पाहून देवांना दया आली. भक्ताचे रक्षण करणे हे माझे ब्रीद आहे असे म्हणून देव वारूळाबाहेर आले. गवळ्याची कुर्‍हाड गायीच्या अंगावर पडणार इतक्यात विष्णूने त्या कुर्‍हाडीचा प्रहार आपल्या डोक्यावर घेतला. खूप रक्तस्त्राव झाला. हे पाहून तो गवळी मरण पावला. हे पाहून ती गाय राजाच्या दरबारी जाऊन जमिनीवर पडून लोळू लागली. राजास आश्चर्य वाटले. सर्व लोक पहावयास धावले. त्या गायीने अरण्याची वाट धरली. राजा म्हणाला हिच्याबरोबर जाऊन काय ते पहा गाय त्या वारूळाजवळ आली. तेथे येऊन ओरडू लागली. लोक येऊन पाहतात तो गवळी मरण पावला आहे. वारूळ फुटले आहे. चहुकडे रक्त उडाले आहे. हे पाहून नोकरांनी ती गोष्ट राजाला सांगितली. राजा तेथे पहाण्यास आला. त्यालाहि आश्चर्य वाटले.

इतक्यात विष्णू वारूळातून बाहेर आले. त्यांचे मस्तक फुटले होते. आणि म्हणाले, दुष्टा मी येथे एकटा वारूळात गुप्त होतो, तू माझे मस्तक फोडून मला दुःख दिले आहेस. मी तुला शाप देईन. तू पिशाच्च म्हणून या अरण्यात हिंडशील. तुला फार दुःख भोगावे लागेल. हा शाप ऐकून राजा घाबरला. त्यांनी भगवंताच्या चरणी मिठी मारून देवा मला व्यर्थ का शाप दिला? तुला दुःख कोणी दिले हे मला माहित नाही. माझी चूक काय आहे सांगा. आता याच्यातून मी मुक्त कसा होईन ते सांगा तेव्हा विष्णु म्हणाले, मी विचार न करता शाप दिला. तुझी कर्मगती विचित्र आहे. भोगल्याशिवाय सुटका नाही. कलीयुगाचा नाश झाल्यानंतर कृतयुगात तुझा उद्धार होईल. तोपर्यंत तू येथे पिशाच्च म्हणून रहा. आकाश नावाचा राजा चंद्रवंशात होईल. त्याची सुंदर कन्या मी वरीन. तो राजा आंदण म्हणून मला एक मुकुट देईल. आठव्या दिवशी शुक्रवारी मी तो मुकुट माझ्या मस्तकावर धारण करीन. तू त्यावेळी दर्शनास येत जा. त्यावेळी तुला सुख होईल.

विष्णूच्या शापाने राजा पिशाच्च होऊन, गुप्त होऊन वनांमध्ये राहिला. भगवान विष्णू वारूळात गुप्तरूपाने राहिले. त्यांनी गुरु बृहस्पतीचे चिंतन केले. तेव्हा ते त्याच्याकडे येऊन वंदन केले. विष्णू म्हणतात, गुरो माझ्या डोक्यात फार वेदना आहेत. याला उपयोग सांगा. गुरु म्हणाले, उंबराच्या चिकात कापसाची राख घालून ती जखमेत भरावी; म्हणजे जखम बरी होईल. गुरुनी औषध करून त्यांच्या डोक्यास बांधून त्यांची आज्ञा घेऊन ते गेले. काही दिवस गेल्यावर विष्णू औषधाचा शोध करण्याकरिता म्हणून अरण्यामध्ये हिंडत असताना एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. रस्त्यातून जात असताना वराहाचा अवतार धारण करणारे श्री विष्णू सगळ्या अरण्यातील प्राण्याबरोबर तेथे आले. श्री विष्णू समोर येताच समोरून राजा येत आहे हे पाहिल्याबरोबर ते गुप्त झाले. तेव्हा ते म्हणाले, मी तुला पाहिले आहे. तू गुप्त होऊ नकोस. पुढे ते एकमेकास भेटले. वराहरूपी नारायण त्याला म्हणाले, 'आपण वैकुंठ सोडून येथे का आलात आपल्या डोक्याला जखम कसली? या अरण्यात का येऊन राहिलात?'

यावर विष्णू म्हणाले, 'भृगु ऋषींनी लाथ मारली म्हणून लक्ष्मी रागावली व ती करवीर क्षेत्री येऊन राहिली. म्हणून मी ही या वनात येऊन राहिलो. येथील गवळ्याने माझे डोके फोडले. मी एकटाच येथे राहतो. मला रहावयास जागा नाही आणि सेवा करावयास कोणी नाही. मला रहावयास जागा द्या.' असे विष्णू म्हणताच वराहरूप विष्णूने त्याला रहावयास जागा दिली व बकुला नावाची दासी दिली. ती दासी त्यांची उत्तम प्रकारे सेवा करू लागली. ती बकुला कोण? तिने एवढे पुण्य केव्हा केले होते? यावर सूत सांगू लागले. कृष्णावतारास गोकुळात नंदाच्या घरी भगवान खेळत होते. मथुरेला भगवान गेल्यावर यशोदा शोक करू लागली. त्यावेळी विष्णूने सांगितले, *'कलियुगात मी प्रगट होईन व तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन.' तीच ही बकुला दासी म्हणजे यशोदा.*

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs