*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*🌺.. श्री.व्यंकटेश विजय ..🌺*
__________🔺___________
अध्याय :- ६ ..
मागील अध्यायात श्रीभगवान विष्णु बकुलेसहित आनंदाने राहिले असे सांगितले. त्यानंतर श्रीविष्णूंनी अरण्यात शिकारीस जाण्याचा विचार ठरविला. इतक्यात एक उत्तम घोडा त्या ठिकाणी आला. त्या घोड्यावर बसून भगवान शिकारीस निघाले असता बकुलेने विचारले, 'आपण कोठे जाता?' तेव्हा ते म्हणाले, 'मी या वनात शिकारी करिता जातो.' अरण्यात जाऊन अनेक प्राण्यांची त्यांनी शिकार केली. त्यांना तेथे एक मदोन्मत्त हत्ती दिसला. त्याच्या मागून ते धावत जाऊ लागले. तो ते नारायणापुरापर्यंत गेले. हत्ती त्रासून भगवंतास शरण आला, तेव्हा त्यांनी त्यास सोडून दिले.
पुढे त्या नगराजवळ एक सुंदर बगीचा दिसला. तेथे विपुल फुले-फळे होती. त्या उद्यानात सुंदर मुली इकडे तिकडे खेळत होत्या. त्यात एक अतिशय सुंदर कन्या वेंकटेशांनी पाहिली व तिजवर ते मोहित होऊन गेले. मध्येच सूतांना ऋषींनी ' या मुली कोण? ती सुंदर मुलगी कोण?' असे विचारले असता त्यांनी त्या मुलीचा इतिहास सांगावयास सुरुवात केली-
पूर्वी द्वापर युगाच्या शेवटी कौरव पांडवांचे युद्ध झाल्यावर अठ्ठाविसाव्या कलियुगात हजार वर्षे गेल्यावर चंद्रवंशात सुवीर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सुधर्म या नावाचा एक मुलगा होता आणि त्यास आकाशराव व तोंडमान या नावाचे दोन फार उत्तम पुत्र होते. हा आकाशराव म्हणजेच पूर्वीचा माधव ब्राह्मण. तो फार धार्मिक व उदार होता. त्याच्या राज्यात प्रजा फार सुखी होती; परंतु या राजाला संतती नसल्याने तो फार दुःखी होता. त्याने आपल्या गुरूंना एकदा याबद्दल विचारले तेव्हा, 'ईश्वरकृपेने सर्व काही ठीक होईल' असे सांगून राजाचे त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. राजाला गुरूंनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यास सांगितले. त्या करिता राजास सोन्याच्या नांगराने जमीन नांगरण्यास सांगितले असता राजाने सोन्याचा नांगर करवू त्याने नांगरण्यास सुरुवात केली. तेव्हा नांगराच्या दातास सोन्याचे एक कमळ लागले. सर्वांना आश्चर्य वाटून त्यांनी ते राजास दाखविले. राजा तो प्रकार पाहून अतिशय आश्चर्यचकित होऊन कमळ पाहू लागला; तो त्या कमळात एक सहा महिन्यांची अतिशय सुंदर मुलगी त्याला आढळली. राजास पारानंद झाला. त्याला ईश्वरकृपेचे मोठे कौतुक वाटले.
इतक्यात आकाशवाणी झाली. 'राजा ही साक्षात लक्ष्मी आहे. तुझ्या पूर्वपुण्याईने तुला ही मिळाली आहे. तू हिचे उत्तम पालन कर. भगवान प्रत्यक्ष येऊन इचे पाणिग्रहण करतील.' राजा त्या मुलीस घेऊन घरी गेला व आपल्या पत्नीस सर्व हकीकत सांगून तिजकडे तिला दिले. राजाचे हे बोलणे ऐकून धरणीदेवीला अतिशय आनंद झाला. सर्व नागरिकांना आनंद झाला व त्यांनी गावात साखर वाटून आनंदोत्सव केला. कमळातून या मुलीचा जन्म झाला म्हणून त्या मुलीचे नाव राजाने पद्मावती असे ठेवले. ती अतिशय रूपवती होती. चंद्रकलेप्रमाणे वाढत असता ती लग्नास योग्य झाली. त्या मुलीच्या पायगुणाने राणीही गर्भवती झाली. राजाला अतिशय आनंद झाला. राजाने तिचे सर्व डोहाळे पुरवून सर्व सोहळे उत्तम केले. सर्वांना आनंद झाला. नऊ महिने होताच राणीला मुलगा झाला. राजाने पुण्याह वाचन करून जातकर्म केले व पुत्राच्या मुखाचे अवलोकन केले. तेव्हा राजाने मोठा दानधर्म केला. नागरिक सुवासिनींनी राणीची ओटी भरली. सर्वांना अतिशय आनंद झाला. पुढे काही दिवसांनंतर पद्मावती उपवर झाली. राजाला तिच्या योग्यतेचा वर कोठे मिळेना.
एक दिवस ती आपल्या मैत्रिणींबरोबर उद्यानात क्रीडा करण्यास गेली होती. तेव्हा नारदांनी वृद्ध ब्राह्मणाचा वेष घेऊन त्या अरण्यांत प्रवेश केला. तेथे मैत्रिणींच्या समुदायात त्यांनी पद्मावतीस पाहिले. नारद तिच्याजवळ गेले व म्हणाले, 'मी हस्त सामुद्रिक आहे. तुझा हात मला दाखव' मुलगी म्हणाली, 'तू कोण आहेस?' 'मी ब्राह्मण आहे.' तेव्हा ती त्यांच्याजवळ येऊन नमस्कार करून आपला डावा हात तिने त्यास दाखविला. तिच्या हातावरील स्वस्तिक चिन्ह पाहून ते म्हणाले, 'ही साक्षात लक्ष्मी असून कलियुगात हिने जन्म घेतला आहे. अशी मुलगी या पृथ्वीवर कुठेही नाही. ही भगवान विष्णूलाच योग्य आहे. नारद म्हणाले, 'तुला भगवान विष्णू पती मिळेल.' ब्राह्मणाचे बोलणे ऐकून तिला आनंद झाला. नारदांना नमस्कार करून ती घरी परत आली.
घरी आल्यावर तिने ही सर्व हकीकत कुणाला सांगितली नाही. परंतु ती कृष्णाचे ध्यान करू लागली. पुढे ती मैत्रिणींबरोबर त्या उपवनात जात असे. याप्रमाणे एकदा ती गेली असता त्याच अरण्यात श्री वेंकटेश शिकारीकरता गेला होता. त्यांना तेथे क्रीडा करणार्या पुष्कळ मुली दिसल्या. व त्या मेळाव्यात पद्मावतीला पाहिले. पद्मावतीने त्यांना पाहिले. वेंकटेशाला पाहून तिला असे वाटले की, हा जर आपल्याला पति मिळेल तर आपले भाग्य फार मोठे आहे. तिने आपल्या सखीला तो कोण आहे ते विचारण्यास सांगितले. त्या वेंकटेशाला विचारू लागल्या, 'तुम्ही कोण? तुमचे आईवडील कोठे असतात. तुम्ही येथे का आलात? तुमचे नाव काय? हे आम्हाला सांगा?'
तेव्हा घोड्यावर बसलेले वेंकटेश त्या मुलीपाशी येऊन म्हणाले, 'हे सुंदरी चंद्रवंशात माझा जन्म झाला. वसुदेव हे माझे वडील. देवकी ही माझी आई. बलराम हे माझे बंधु. सुभद्रा ही बहीण. अर्जुन हा माझा मेहुणा. माझे नाव श्रीकृष्ण. मला लग्न करावयाचे आहे. म्हणून मी येथे आलो. तू कोण सांग?' तिने आपली हकीगत सांगितली-
'सोमवंशात आकाशराजा नावाचा प्रसिद्ध राजा आहे. त्याची मी मुलगी. मग वेंकटेश म्हणाले, 'तुझ्याशी मी विवाह करू इच्छितो.' पद्मावती म्हणाली, 'भिल्ला! ही हकीकत राजाच्या कानावर पडली तर फार मोठी हानी होईल. असे म्हणून त्या मुलींच्यासह ती निघून गेली. श्री वेंकटेश तिच्या मागून चालले. आपल्या मागून हा येतो आहे हे पाहून त्या मुलींनी त्याच्यावर दगड मारले. त्यांनी त्याचा घोडा पाडला. घोड्यास सोडून ते आपल्या मंदिराला येऊन चिंतातूर होऊन राहिले. सर्व आहारविहार बंद झाले. झोप नाही तेव्हा बकुला त्यांना म्हणाली, 'तुला काय झाले? तू असा दुःखी का?' त्यावेळी वेंकटेशांनी उपवनात घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर बकुला म्हणाली, 'मला मार्ग सांगा. मी आताच जाते. मुलगी तुला द्यावी म्हणून त्याला सांगून निश्चय करून येते.'
वेंकटेशांनी तिचा पूर्व इतिहास सांगितला. 'मागील जन्मात मी राम होतो. ही सीता होती. रावणाने तिला लंकेस नेले होते. ती अग्नीजवळ गुप्त होऊन राहिली. रावणवधानंतर ती प्रगट झाली असता आता आपण माझा स्वीकार करावा असे तिने सांगितले असताना रामाने तिला आश्वासन दिले, 'मी एक पत्नीव्रत असल्याने या अवतारात तुझा स्वीकार करता येत नाही. तुला असा वर देतो की पुढे २८व्या कलियुगात मी वेंकटेश या नावाने पृथ्वीवर प्रगट होईन त्यावेळी तुझी इच्छा पूर्ण करता येईल.' त्यांनी आपला अवतार संपविला.
सीता हीच पुढे आकाशराजाची मुलगी जन्मास आली. तेव्हा बकुला म्हणाली, 'मला मार्ग सांग.' वेंकटेशांनी हास्य केले व म्हणाले, 'मी तुला घोडा देतो.' असे म्हणून एक घोडा त्या थिकाणी उत्पन्न केला. त्याच्यावर बसून ती निघाली. त्यांनी तिला मार्ग दाखविला ' त्या वाटेने जाताना तुला कपिलेश्वर मंदिर लागेल. त्या ठिकाणी कैलासपतीचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे प्रार्थना कर, हे कैलासपती आपण समर्थ आहात माझी इच्छा पूर्ण करा. त्यापुढे गेल्यावर शुकाचार्यांचा आश्रम लागेल. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे रामकृष्णांच्या मूर्ती लागतील. तिथून पुढे गेल्यावर अगस्तींचा आश्रम व नारायणपूर लागेल.
घोड्यावर बसून ती निघाली. वाटेतील सगळी स्थाने तिने पाहिली. अगस्तींच्या आश्रमाजवळील शिवमंदिरात ब्राह्मण रुद्राभिषेक करीत होते. ते पहाण्यास नारायणपुरातील लोक, पद्मावतीच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्या दर्शन घेऊन निघाल्या असताना त्यांचे आपसातील बोलणे तिने ऐकले. त्या म्हणत होत्या की या अरण्यातील सुंदर पुरुषाच्या दर्शनाने पद्मावती दुःखी झालेली आहे. त्यांच्या सखीचे बोलणे ऐकून बकुलेने विचारले, 'ती कोण? तिला कोण पुरुष भेटला?' *तिच्या सखींनी सगळी हकीकत सांगितली. या पुढील इतिहास पुढच्या अध्यायात पाहू.*
〰〰〰〰〰〰📕
सं - श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*